पत्रातून ह्रदय उलगडते – अरविंद जगताप

 पत्रातून ह्रदय उलगडते – अरविंद जगताप



उदगीर : 21 व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती डोळे दिपवणारी असली तरी, तंत्रज्ञानातून भावना पोहचविण्यामध्ये आपण कमी पडतोय. मोबाईल वरील एसएमएस पेक्षा पत्रातून ह्रदय अधिक चांगल्या पद्धतीने उलगडते असे मत चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतून पत्रास कारण की चे लेखन करणारे अरविंद जगताप यांनी व्यक्त केली. ते ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तथा संमेलन कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीर चे अध्यक्ष  रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, नाम फाऊंडेशनचे विलास चामे यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना जगताप म्हणाले कोणत्याही कार्यासाठी सल्ले देणारे अनेक लोक भेटतात पण प्रत्यक्ष कार्य करणारे अत्यल्प असतात. त्यामुळे स्थानिक लोकांना अधिकाधिक संधी देऊन संमेलन अविस्मरणीय करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, अशी भावना व्यक्त केली. कार्याध्यक्ष नागराळकर म्हणाले, साहित्य संमेलनातून ज्ञानदानावर अधिक भर दिला जाणार आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हीरकमहोत्सवा निमित्त आयोजकत्व स्विकारले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. के. मस्के यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार प्रा. डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी मानले.