साहित्यिक आपल्या घरी उपक्रम महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार

 साहित्यिक आपल्या घरी उपक्रम

महिला सारस्वतांच्या स्वागतासाठी उदगीरच्या महिलांचा पुढाकार


उदगीर: उदगीर येथे 22, 23 व 24 एप्रिल रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या महिला साहित्यिक यांच्या व्यवस्थेची जबाबदारी शहरातील महिलांनी घेतली असल्याने त्यांच्या या भूमिकेचे संमेलन समितीकडून स्वागत करण्यात आले आहे.
उदगीर येथे उदयगिरी महाविद्यालयात दि. 22 ,23 व 24 एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी देशभरातुन साहित्यिक मंडळी येत आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी संमेलन समितीकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच संमेलन समितीने साहित्यिक आपल्या घरी या उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांना शहरात येणाऱ्या साहित्यिक मंडळींची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साद घालत शहरातील काही महिलांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांची भेट घेऊन आमच्या माध्यमातून कमीत कमी 50 महिला साहित्यिक भगिनींची राहण्याची सोय करू अशी ग्वाही दिली. या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन महिला साहित्यिक यांची राहण्याची सोय करणार असल्याचे जाहीर केल्याबद्दल संमेलन कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी त्यांचे आभार मानून स्वागत केले. यावेळी महानंदा सोनटक्के, प्राचार्या डॉ. सुनीता चवळे, प्रा. मंगला विश्वनाथे, योजना चणगे,
ज्योत्स्ना समगे, ज्योती चौधरी, सरस्वती चौधरी, विद्या पांढरे, अन्नपूर्णा मुस्तादार,मंजू समगे,योजना चौधरी या महिलांनी महिला साहित्यिकांच्या निवासाची जबाबदारी स्वीकारली आहे.