जि. प.शाळेत साहित्य संमेलनाचा प्रचार: विद्यार्थी कवितेत रंगले......


जि. प.शाळेत साहित्य संमेलनाचा प्रचार: 

विद्यार्थी कवितेत रंगले......

उदगीर: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय , उदगीर येथे दि.२२ते२४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानवडा ता.औसा येथे शब्दपंढरी प्रतिष्ठान,लातूर तर्फे "कविता आपल्या भेटीला" हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास शब्दपंढरी प्रतिष्ठानचे योगिराज माने,दयानंद बिराजदार,विश्वंभर इंगोले व नामदेव कोद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे, दयानंद तळेकर,एकनाथ सोमवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी दयानंद बिराजदार यांनी करून "इवल इवल तुझं पाऊल शाळेत पडलं.. मायीच्या चेह-यावर चांदणं गोंदलं"या काव्यपंक्ती सादर करताच लेकरांच्या अंगात उत्साह संचारला..
नामदेव कोद्रे यांनी "चला उदगीरला जाऊ,मेळा साहित्याचा पाहू..
ग्रंथ दिंडी पालखीला,सारे खांद्यावर घेऊ" या ओळी सादर करून लेकरांना साहित्य संमेलनास येण्याचे निमंत्रण दिले.
विश्वंभर इंगोले यांनी "मित्रा आता मोबाइलवर गेम खेळणे टाळू.. चला जरासे आनंदाने मैदानावर खेळू" या कवितेतून लेकरांना खेळाचे महत्व पटवून दिले..
योगिराज माने यांनी "गम्माडी गंमत करू या.. फुलपाखरू धरू या"असे म्हणताच सा-या लेकरांची नजर फुलपाखरांना शोधू लागली.
अनिता कुर्लकर,मीरा कुलकर्णी ,ज्योती मादळे,रचना पुरी यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
कवयित्री शोभा माने यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन केले.मंदाकिनी उकादेवडे यांनी आभारप्रदर्शन केले.