पालिका हद्दीत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी: जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आदेश

 पालिका हद्दीत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी: जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे आदेश

लातूर : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्री 11 वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी काढले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्याविरोधात कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

लातूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. शिवाय वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप अंगदुखी इ. कोरोना सदृष्य लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे कोविड आजाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्हयातील लातूर महापालिका व उदगीर, निलंगा, अहमदपूर व औसा या नगर पालिका हद्दीत दररोज रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात येणार असून या आदेशातून जीवनावश्यक सेवा ज्यात वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांना सूट देण्यात आली आहे. दरम्यान कोविड सुरक्षा नियम, शारीरिक अंतर, मस्कचा वापर, निर्जंतुकिकरण, वैयक्तिक स्वच्छता ई. सावधगिरीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी या आदेशात नमूद केले आहे.