*माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अनंतात विलीन*

*माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अनंतात विलीन*


*निलंगा येथे शासकीय इतमामात अंत्यविधी*


लातूर :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज (दि. 5 ऑगस्ट) पहाटे पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. आज दुपारी निलंगा येथे त्यांच्या घरी पार्थिव सामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते . त्यानंतर सायंकाळी निलंग्याजवळील निलंगेकर कुटुंबियांच्या शेतात शासकीय इतमामात डॉ. शिवाजीराव पाटील - निलंगेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवास पुत्र शरदराव, अशोकराव आणि विजयराव तसेच नातू संभाजी पाटील - निलंगेकर यांनी मुखाग्नी दिला.


प्रारंभी वैदिक पध्दतीने मंत्रोपोचार करण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून डॉ . पाटील - निलंगेकर यांना मानवंदना देण्यात आली. हा अंत्यविधी कार्यक्रम शासकीय इतिमामात करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी डॉ . पाटील - निलंगेकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनी ही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उप विभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच उस्मानाबाद चे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी सम्पूर्ण देशभरातून आलेल्या शोक संदेशाचे वाचन करण्यात आले. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री अमित देशमुख यांचे शोक संदेश वाचण्यात आले.


यावेळी माजी पालकमंत्री तथा निलंगा विधानसभा मतदार संघाचे आ. संभाजी पाटील निलंगेकर,डॉ . निलंगेकर यांचे पुत्र शरदराव, अशोकराव, विजयराव व मुलगी चंद्रकला यासह सर्व निलंगेकर कुटुंबिय उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष श्रीमती साळुंखे, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार शिवाजी पाटील - कव्हेकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


डॉ . निलंगेकर हे 1985 ते 86 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.