निलंग्यात रक्तदानाचा विक्रम तब्बल 600 जणांनी केले रक्तदान

निलंग्यात रक्तदानाचा विक्रम


तब्बल 600 जणांनी केले रक्तदान


निलंगा (विशाल हलकीकर): 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निलंगा येथे आयोजित केलेल्या रक्तदानाने मोठा विक्रम केला असून तब्बल 600 दात्यांनी रक्तदान केले आहे.


गेल्या 20 वर्षांपासून निलंगा येथील स्वराज फाउंडेशन व देशमुख हॉस्पिटल च्या वतीने महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत असे. मात्र लॉकडाऊनमुळे यावर्षी एक जून रोजी हे शिबिर नक्षत्र मंगल कार्यालयात घेण्यात आले. राज्यात कोरोना आजाराने रुग्णांची वाढ होत असताना रक्ताचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वाढत्या रक्ताच्या तुटवाड्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील युवकांना रक्तदानांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वराज फाउंडेशन व देशमुख हॉस्पिटलच्या वतीने 1 जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदात्याना रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला निलंगा शहर व परिसरातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या शिबिरात तब्बल 600 जणांनी रक्तदान केल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे महिलांनी देखील मोठ्या संख्येनी रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.


माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रा. दयानंद चोपणे, प्रा. गजेंद्र तरंगे, अनिल अग्रवाल, दादाराव जाधव यांच्यासह मान्यवरांनी या शिबिरास भेट देऊन रक्तदाते व शिबीर आयोजक यांचे कौतुक केले.


या शिबिरासाठी डॉ. लालासाहेब देशमुख, प्रा. दत्ता शाहीर यांच्यासह स्वराज फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यानी पुढाकार घेतला.