उदगीरात उद्यापासून 10 तारखेपर्यंत संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उदगीरात उद्यापासून 10 तारखेपर्यंत संचारबंदी लागू : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
उदगीर : मागच्या काही दिवसांपासून उदगीर शहरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहून त्यावर आळा बसावा याकरीता उदगीर शहरात 10 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काढले आहेत. 
उदगीर शहरात गेल्या आठवड्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर शहरात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. नंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पुन्हा दोन दिवसासाठी कर्फ्युत वाढ करण्यात आली होती. शिवाय ज्या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहे त्या परिसरात कन्टोन्मेंट झोन जाहीर करून कोणालाही येण्याजण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय सदरील परिसरात 14 दिवसासाठी संचारबंदी कायम ठेवण्यात आली. काल बुधवारी उदगीर शहरात एकाच दिवशी सात नवे रुग्ण आढळून आले असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सदरील नवीन सात रुग्ण जुन्याच कन्टोन्मेंट झोनमधील असल्याचे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन परिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी संपूर्ण शहरात कर्फ्यु लागू करीत असल्याचे सांगितले. या काळात मेडिकल, हॉस्पिटल, घरपोच गॅस सेवा, पिण्याचे पाणी सेवा, दूध वितरण, अन्य अत्यावश्यक सेवा याना मुभा राहील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेश पत्रात नमूद केले आहे.