लॉकडाऊन कालावधी वाढीनंतर राज्याची तीन झोन मध्ये विभागणी लातूर जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश

लॉकडाऊन कालावधी वाढीनंतर राज्याची तीन झोन मध्ये विभागणी
लातूर जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश
उदगीर : राज्यसरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढविल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार राज्याची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे.
कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असतानाच गेल्या तीन आठवड्यापूर्वी राज्यात व देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शिवाय राज्यातील वाहतूकही पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत झाली. परंतु कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होण्याऐवजी दररोज वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन चा कालावधी संपण्याच्या अगोदरच हा कालावधी आणखी दोन आठवड्यासाठी वाढवत असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारने हा कालावधी वाढविल्यानंतर राज्याची तीन विभागात विभाजन करण्यात आले आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन अशा तीन विभागात हे विभाजन करण्यात आले असून ज्या जिल्ह्यात पंधरापेक्षा जास्त रुग्ण असतील त्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. या विभागातील जिल्ह्यात लॉकडाऊन चालू राहत असतानाच निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. ज्या जिल्ह्यात पंधरा पेक्षा कमी रुग्ण आहेत त्या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. या जिल्ह्याच्या सीमा बंद ठेवून निर्बन्ध कमी होणार आहेत. शिवाय वाहतुकीत थोडीफार सवलत मिळणार आहे. तर ज्या जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अशा जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहेत. या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने हटविले जाणार असून जनजीवनही लवकरच पूर्वपदावर आणले जाईल.
लातूर जिल्ह्यात निलंगा येथे गेल्या आठवड्यात सापडलेल्या रुग्णामध्ये आठजण पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांना कोरंटाईनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे आठ पॉझिटिव्हचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे.


रेड झोन जिल्हे– मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद


ऑरेंज झोन जिल्हे- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि गोदिंया


ग्रीन झोन- धुळे, नंदुरबार, परभणी, सोलापूर, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भांडारा आणि गडचिरोली