शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे
 - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 


निलंगा :देशभरात सुरू असणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गरजेनुसार खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे,त्याचे योग्य नियोजन केले जावे, अशी मागणी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे .आ. निलंगेकर यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे .
शुक्रवारी (दि.२४ )व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खरीप हंगामपूर्व बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील खासदार व आमदारांना यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु या बैठकीत खासदार ,आमदार ,मंत्री व अधिकाऱ्यांचा सुसंवाद होऊ शकला नाही. त्यामुळेच या प्रकारबद्दल नाराजी व्यक्त करत आ.निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन ही मागणी केली.
 पुढील काळात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे नियमानुसार कोरोंटाईन  करावे ,अशी मागणी करतानाच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातून जिल्हा कोरोना मुक्त झाल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
 पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणाची गरज आहे .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून खत व बियाणे बांधावर उपलब्ध करून द्यावे .जिल्ह्यातील काही तालुके राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे बोगस खते व बियाणांचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी. बोगस खते व बियाणे उत्पादन करणाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना वेळेत खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे.खरीप व रब्बी हंगामात तूर व हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे .या शेतमालाची खरेदी करण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत. निलंगा विधानसभा मतदारसंघातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. शेतजमीन चांगली आहे .त्यासाठी ७१ हजार ९६० मेट्रिक टन खत व ८६ हजार ७६६ क्विंटल बियाणे आवश्यक असून ते शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावे ,अशी मागणीही आ. निलंगेकर यांनी केली आहे.