संचारबंदीच्या नियमांचे जनतेनी तंतोतंत पालन करावे : उपविभागीय अधिकारी मेगशेट्टी उदगीर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली असून कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन घराबाहेर न पडता संचारबंदीच्या नियमाचे पालन करावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्याची वेळ येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी दिला आहे. प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना  उदगीर शहरातील काही टवाळखोर हे विनाकारण दुचाकी वाहणावरून बिनबोभाट बाहेर फिरत आहेत. लोकांना कितीही सांगितले तरी नागरिक काहीतरी निमित्त सांगून रस्त्यावर येत आहेत. शहरात सर्व अत्यावश्यक सुविधा कायम पुरविण्यात येणार असताना देखील अन्नधान्य खरेदी, मेडिकलच्या नावावर लोक बाहेर येत असल्याने प्रशासनाला कडक भूमिका घ्यायची वेळ येऊ देऊ नका असे आवाहन करीत जनतेनी प्रशासनास सहकार्य करावे व विनाकारण संचारबंदी काळात बाहेर फिरु नये असेही सांगितले. दि. २८ मार्चपासून भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते याना जिल्हा परिषदेच्या प्रशालेच्या मैदानात जागा देण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी न करता याच ठिकाणी येऊन भाजीपाला व फळे खरेदी करावीत असे आवाहनही उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांनी केले आहे.